लूकने सांगितलेला संदेश
१२ इकडे, हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. गर्दी इतकी वाढली की लोक एकमेकांच्या पायांवर पाय देऊ लागले. तेव्हा येशूने लोकांना शिकवायला सुरुवात केली आणि सगळ्यात आधी तो आपल्या शिष्यांकडे वळून म्हणाला: “परूश्यांच्या खमिरापासून, म्हणजे त्यांच्या ढोंगीपणापासून सांभाळा.+ २ पण काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी उघड होणार नाही आणि अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही, जी उजेडात येणार नाही.+ ३ म्हणून, तुम्ही जे काही अंधारात बोलता ते उजेडात ऐकलं जाईल. आणि आतल्या खोल्यांत जे काही कुजबुजता ते घरांच्या छतांवरून घोषित केलं जाईल. ४ माझ्या मित्रांनो,+ मी तुम्हाला हेही सांगतो, की जे शरीर नष्ट करतात, पण नंतर यापेक्षा जास्त काही करू शकत नाहीत त्यांना घाबरू नका.+ ५ पण कोणाला घाबरावं हे मी तुम्हाला सांगतो: जिवे मारल्यानंतर गेहेन्नात* टाकण्याचा ज्याला अधिकार आहे त्याला घाबरा.+ हो, मी तुम्हाला सांगतो, त्यालाच घाबरा.+ ६ दोन पैशांना* पाच चिमण्या विकल्या जातात की नाही? तरीपण, त्यांपैकी एकीलाही देव विसरत नाही.*+ ७ खरंतर, तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत.+ म्हणून घाबरू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात.+
८ मी तुम्हाला सांगतो, जो माझ्यावर विश्वास असल्याचं लोकांसमोर स्वीकारतो,+ त्याला मनुष्याचा मुलगासुद्धा देवाच्या दूतांसमोर स्वीकारेल.+ ९ पण जो लोकांसमोर मला नाकारतो, त्याला देवाच्या दूतांसमोर नाकारलं जाईल.+ १० तसंच, जो मनुष्याच्या मुलाविरुद्ध काही बोलतो, त्याला क्षमा केली जाईल. पण जो पवित्र शक्तीची* निंदा करतो त्याला क्षमा केली जाणार नाही.+ ११ ते तुम्हाला जनसभांसमोर,* शासकांसमोर किंवा अधिकाऱ्यांसमोर आणतील तेव्हा आपल्या बचावासाठी काय बोलावं किंवा कसं बोलावं याची चिंता करू नका.+ १२ कारण तुम्ही काय बोलावं हे पवित्र शक्ती त्याच वेळी तुम्हाला शिकवेल.”+
१३ मग जमलेल्या लोकांपैकी एक जण त्याला म्हणाला: “गुरुजी, आम्हाला वारशाने मिळालेल्या संपत्तीची वाटणी करायला माझ्या भावाला सांगा.” १४ तो त्याला म्हणाला: “मला तुमचा न्यायाधीश किंवा वाटणी करणारा म्हणून कोणी नेमलं?” १५ मग तो त्यांना म्हणाला: “आपले डोळे उघडे ठेवा आणि सगळ्या प्रकारच्या लोभापासून सांभाळा.+ कारण एखाद्याकडे भरपूर संपत्ती असली, तरी ती त्याला जीवन देऊ शकत नाही.”+ १६ तेव्हा, त्याने त्यांना एक उदाहरण दिलं: “एका श्रीमंत माणसाच्या जमिनीत भरपूर पीक आलं. १७ त्यामुळे, तो आपल्या मनात विचार करू लागला, ‘इतकं धान्य साठवण्यासाठी जागा नाही, मग आता मी काय करू?’ १८ तेव्हा तो म्हणाला, ‘मी असं करीन:+ माझी धान्याची कोठारं पाडून मी मोठी कोठारं बांधीन आणि तिथे माझं सगळं धान्य आणि मालमत्ता साठवीन. १९ मग मी स्वतःला* म्हणीन: “पुढची बरीच वर्षं पुरतील इतक्या उत्तम गोष्टी तू* साठवल्या आहेत. तेव्हा काळजी करू नकोस, खा, पी आणि मौजमजा कर.”’ २० पण देव त्याला म्हणाला, ‘अरे मूर्खा! आज रात्री तू मरशील.* मग तू साठवलेल्या या सगळ्या गोष्टी कोणाला मिळतील?’+ २१ जो माणूस स्वतःसाठी धनसंपत्ती साठवतो, पण देवाच्या दृष्टीने श्रीमंत नाही त्याची हीच अवस्था होईल.”+
२२ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “म्हणूनच मी तुम्हाला सांगतो: काय खावं अशी आपल्या जिवाबद्दल किंवा काय घालावं अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करायचं सोडून द्या.+ २३ कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं आहे. २४ कावळ्यांचं उदाहरण घ्या: ते पेरणी किंवा कापणी करत नाहीत. त्यांच्याजवळ धान्याचं कोठार किंवा गोदाम नसतं. तरीसुद्धा देव त्यांना खाऊ घालतो.+ तुम्ही पक्ष्यांपेक्षा जास्त मौल्यवान नाही का?+ २५ चिंता करून कोणी आपलं आयुष्य हातभर* वाढवू शकतं का? २६ जर एवढीशी गोष्ट तुम्ही करू शकत नाही, तर मग इतर गोष्टींची चिंता तुम्ही का करता?+ २७ रानातली फुलं कशी वाढतात याचा विचार करा: ती कष्ट करत नाहीत किंवा सूतही कातत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो, की शलमोन इतका वैभवी राजा असूनही त्यानेसुद्धा कधी या फुलांसारखा सुंदर पेहराव केला नव्हता.+ २८ रानातली झाडंझुडपं आज आहेत, पण उद्या ती भट्टीत* टाकली जातात, त्यांना जर देव इतकं सुंदर सजवतो, तर अरे अल्पविश्वासी* लोकांनो, तो तुम्हाला घालायला कपडे देणार नाही का? २९ म्हणून, काय खावं आणि काय प्यावं याबद्दल काळजी करायचं आणि खूप जास्त चिंता करायचं सोडून द्या.+ ३० कारण या गोष्टी मिळवण्यासाठी जगातले लोक धडपड करत आहेत. पण तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे स्वर्गातल्या तुमच्या पित्याला माहीत आहे.+ ३१ त्याऐवजी, देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा, म्हणजे या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.+
३२ लहान कळपा, भिऊ नको.+ कारण तुम्हाला राज्य द्यायला तुमच्या पित्याला आनंद झालाय.+ ३३ म्हणून, आपली मालमत्ता विकून गरिबांना दान द्या+ आणि झिजणार नाहीत, असे पैशांचे बटवे तयार करा. म्हणजेच स्वर्गात अशी संपत्ती साठवा जी कधीच संपणार नाही.+ तिथे चोर पोहोचू शकणार नाही आणि तिथे तिला कसरही लागणार नाही. ३४ कारण जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.
३५ कंबर कसून तयार राहा+ आणि आपले दिवे पेटते ठेवा.+ ३६ आपला मालक लग्नाहून परत येण्याची वाट पाहणाऱ्या+ माणसांसारखे असा.+ कारण तो परत येऊन दार ठोठावताच ते त्याच्यासाठी दार उघडायला तयार असतात. ३७ मालक आल्यावर जे दास जागे असलेले त्याला दिसतील ते सुखी! मी तुम्हाला खरं सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल. आणि त्यांना जेवणाच्या मेजावर बसायला सांगून तो त्यांच्याजवळ उभा राहील आणि त्यांना जेवण वाढेल. ३८ तो दुसऱ्या प्रहरी,* इतकंच काय तर तिसऱ्या प्रहरी* आल्यावरही जे त्याला तयार असलेले दिसतील, ते सुखी! ३९ पण हे लक्षात ठेवा, की चोर केव्हा येणार आहे, हे जर घराच्या मालकाला माहीत असतं, तर त्याने त्याला आपलं घर फोडू दिलं नसतं.+ ४० तुम्हीसुद्धा तयार असा, कारण तुम्ही अपेक्षा केली नसेल अशा वेळी मनुष्याचा मुलगा येत आहे.”+
४१ मग पेत्र म्हणाला: “प्रभू, तू हे उदाहरण फक्त आम्हालाच सांगत आहेस, की सगळ्यांना?” ४२ तेव्हा प्रभू म्हणाला: “आपल्या घरातल्या सेवकांना योग्य वेळी, योग्य प्रमाणात अन्न पुरवत राहण्यासाठी मालक ज्याला नेमेल, असा विश्वासू आणि बुद्धिमान* कारभारी* खरोखर कोण आहे?+ ४३ मालक परत आल्यावर तो त्याला तसं करताना दिसला, तर तो दास आशीर्वादित ठरेल! ४४ मी तुम्हाला खरं सांगतो, तो त्याला आपल्या सगळ्या मालमत्तेवर अधिकार देईल. ४५ पण जर तो दास कधी आपल्या मनात म्हणाला, की ‘माझ्या मालकाला परत यायला उशीर लागतोय,’ आणि जर तो घरातल्या दासदासींना मारहाण करू लागला आणि खाऊ-पिऊ लागला आणि दारुडा झाला,+ ४६ तर त्याने अपेक्षाही केली नसेल अशा दिवशी आणि त्याला कल्पनाही नसेल अशा वेळी त्याचा मालक येईल. तो त्याला सगळ्यात कडक शिक्षा देईल आणि अविश्वासू लोकांमध्ये त्याला टाकून देईल.* ४७ मग आपल्या मालकाची इच्छा काय आहे, हे समजूनही जो दास तयार नव्हता किंवा ज्याने त्याला दिलेलं काम केलं नाही,* त्याला खूप फटके मारले जातील.+ ४८ पण ज्याला आपल्या मालकाची इच्छा काय आहे हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे त्याने फटके खाण्यालायक काम केलं, त्याला कमी फटके मारले जातील. खरंच, ज्याला जास्त देण्यात आलं होतं त्या प्रत्येकाकडून जास्त मागितलं जाईल आणि ज्याला बऱ्याच गोष्टींवर नेमण्यात आलं होतं, त्याच्याकडून आणखीनच जास्त मागितलं जाईल.+
४९ मी पृथ्वीवर आग पेटवायला आलोय आणि जर ती आधीच पेटली असेल, तर मला आणखी काय पाहिजे? ५० हो, मला एक बाप्तिस्मा घ्यावा लागणार आहे आणि माझा हा बाप्तिस्मा पूर्ण होईपर्यंत मी खूप अस्वस्थ असेन!+ ५१ मी पृथ्वीवर शांती आणायला आलोय, असं तुम्हाला वाटतं का? मुळीच नाही. उलट मी फूट पाडायला आलोय.+ ५२ कारण आतापासून एकाच घरातल्या पाच जणांमध्ये फूट पडेल. तिघांविरुद्ध दोघं आणि दोघांविरुद्ध तिघं अशी फूट पडेल. ५३ मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी त्यांच्यात फूट पडेल.”+
५४ तो लोकसमुदायाला पुढे म्हणाला: “पश्चिमेकडून ढग वर येताना तुम्ही पाहता तेव्हा लगेच तुम्ही म्हणता, ‘वादळ येणार आहे,’ आणि तसंच घडतं. ५५ आणि दक्षिणेचा वारा वाहू लागतो तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आता उष्णतेची लाट येईल,’ आणि तसंच घडतं. ५६ अरे ढोंग्यांनो! पृथ्वी आणि आकाशाचं स्वरूप पाहून हवामान कसं असेल हे तर तुम्ही अचूक ओळखता, पण या विशिष्ट काळाचा अर्थ तुम्हाला का समजत नाही?+ ५७ आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हाला स्वतःला का ठरवता येत नाही? ५८ उदाहरणार्थ, तुमच्याविरुद्ध खटला भरणाऱ्यासोबत तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे जात असताना, वाटेतच त्याच्याशी वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तो तुम्हाला न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायाच्या हाती सोपवेल आणि शिपाई तुम्हाला तुरुंगात डांबेल.+ ५९ मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्ही त्याची एकेक दमडी* फेडेपर्यंत तुम्हाला तिथून मुळीच सुटका मिळणार नाही.”