लूकने सांगितलेला संदेश
१४ एकदा, येशू शब्बाथाच्या दिवशी परूश्यांच्या एका अधिकाऱ्याच्या घरी जेवायला गेला. तिथे लोकांचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं. २ त्या ठिकाणी जलोदर* नावाचा रोग झालेला एक माणूस त्याच्यासमोर होता. ३ तेव्हा येशूने नियमशास्त्राचे जाणकार आणि परूशी यांना विचारलं: “शब्बाथाच्या दिवशी एखाद्याला बरं करणं नियमाप्रमाणे योग्य आहे की नाही?”+ ४ पण ते शांतच राहिले. तेव्हा येशूने त्या माणसाला स्पर्श करून बरं केलं आणि त्याला पाठवून दिलं. ५ मग तो त्यांना म्हणाला: “तुमच्यापैकी असा कोण आहे, ज्याचा मुलगा किंवा बैल शब्बाथाच्या दिवशी विहिरीत पडला,+ तर तो त्याला लगेच ओढून बाहेर काढणार नाही?”+ ६ तेव्हा ते त्याला काहीही उत्तर देऊ शकले नाहीत.
७ मग मेजवानीला आलेले लोक बसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या जागा निवडून घेत आहेत, हे पाहून त्याने त्यांना एक उदाहरण सांगितलं.+ तो त्यांना म्हणाला: ८ “कोणी तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण दिलं, तर सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन बसू नका.+ कारण, कदाचित तुमच्यापेक्षाही महत्त्वाच्या एखाद्या व्यक्तीला मेजवानीला बोलावण्यात आलं असेल. ९ मग ज्याने तुम्हा दोघांनाही आमंत्रण दिलं तो येऊन तुम्हाला म्हणेल, ‘या माणसाला तुझ्या जागेवर बसू दे.’ तेव्हा तुम्हाला लाजेने मान खाली घालून सगळ्यात खालच्या जागेवर जाऊन बसावं लागेल. १० म्हणून, जेव्हा तुम्हाला आमंत्रण दिलं जातं तेव्हा सगळ्यात खालच्या जागी जाऊन बसा. म्हणजे तुम्हाला आमंत्रण देणारा येऊन म्हणेल, ‘मित्रा, जा तिथे वरती जाऊन बस.’ मग सगळ्या पाहुण्यांच्या देखत तुमचा सन्मान होईल.+ ११ कारण जो स्वतःचा गौरव करतो त्याला नमवलं जाईल आणि जो स्वतःला नम्र करतो त्याचा गौरव केला जाईल.”+
१२ त्यानंतर ज्या माणसाने आमंत्रण दिलं होतं त्याला येशू म्हणाला: “जेव्हाही तू दुपारी किंवा संध्याकाळी मेजवानी देशील, तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, नातेवाइकांना किंवा तुझ्या श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नकोस. नाहीतर, तेसुद्धा तुला आमंत्रण देतील आणि त्यांनी तुझी परतफेड केल्यासारखं हे होईल. १३ त्याऐवजी, तू मेजवानी देशील तेव्हा जे गरीब, लंगडेलुळे आणि आंधळे आहेत त्यांना आमंत्रण दे.+ १४ म्हणजे तू आनंदी होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही नाही. जेव्हा नीतिमान लोकांना मेलेल्यांतून पुन्हा जिवंत केलं जाईल* तेव्हा तुला याचं प्रतिफळ मिळेल.”+
१५ या गोष्टी ऐकून पाहुण्यांपैकी एक जण त्याला म्हणाला: “जो देवाच्या राज्यात मेजवानीला बसेल* तो किती धन्य!”
१६ येशू त्याला म्हणाला: “एका माणसाने संध्याकाळी मोठी मेजवानी ठेवली+ आणि त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिलं. १७ जेवणाच्या वेळी त्याने आमंत्रण दिलेल्या लोकांकडे आपल्या दासाला असा निरोप घेऊन पाठवलं, की ‘चला, सगळी तयारी झाली आहे.’ १८ पण ते सगळे निमित्तं सांगू लागले.+ पहिला म्हणाला, ‘मी एक शेत विकत घेतलंय आणि मला ते पाहायला जायचंय. कृपा करून, मला माफ कर.’ १९ दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत आणि त्या व्यवस्थित आहेत की नाही याची खातरी करायला मला जायचंय. कृपा करून मला माफ कर.’+ २० आणखी एक जण म्हणाला, ‘माझं नुकतंच लग्न झालंय आणि त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’ २१ मग दासाने परत येऊन मालकाला हे सगळं सांगितलं. तेव्हा मालकाला राग आला आणि तो आपल्या दासाला म्हणाला, ‘लगेच जा आणि शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत जाऊन जे गरीब, लंगडेलुळे आणि आंधळे दिसतील त्यांना इथे घेऊन ये.’ २२ परत आल्यावर तो दास म्हणाला, ‘मालक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालंय, पण अजूनही जागा शिल्लक आहे.’ २३ तेव्हा मालक दासाला म्हणाला, ‘रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये जा आणि लोकांना आग्रह करून घेऊन ये म्हणजे माझं घर भरून जाईल.+ २४ कारण मी तुम्हाला सांगतो, आमंत्रण दिलेल्यांपैकी एकालाही माझ्या मेजवानीतलं काही चाखायला मिळणार नाही.’”+
२५ एकदा त्याच्याबरोबर मोठ्या संख्येने लोक जात होते. तेव्हा तो वळून त्यांना म्हणाला: २६ “जर कोणी माझ्याकडे येतो, पण आपले वडील, आई, बायको, मुलं, भाऊ आणि बहिणी यांचा, इतकंच काय तर स्वतःचाही* द्वेष* करत नाही,+ तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.+ २७ जो आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे येत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही.+ २८ उदाहरणार्थ, तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याला एक बुरूज बांधायचा असेल, तर तो आधी बसून खर्चाचा हिशोब लावणार नाही? आणि तो पूर्ण करायची आपली ऐपत आहे की नाही याची खातरी करणार नाही? २९ नाहीतर पाया घातल्यावर त्याला बांधकाम पूर्ण करता येणार नाही आणि लोक त्याची थट्टा करू लागतील. ३० ते म्हणतील: ‘या माणसाने बांधकाम तर सुरू केलं, पण याला ते पूर्ण करता आलं नाही.’ ३१ किंवा असा कोणता राजा असेल, जो लढाईत दुसऱ्या राजाचा सामना करायला जाताना आधी बसून विचार करणार नाही? मी आपल्या १०,००० सैनिकांच्या मदतीने त्याच्या २०,००० सैनिकांचा सामना करू शकेन का, असा तो नक्कीच विचार करेल. ३२ आणि जर त्याला सामना करणं शक्य नसेल, तर दुसरा राजा दूर असतानाच तो त्याच्याकडे आपले राजदूत पाठवून समेट करायचा प्रयत्न करेल. ३३ त्याच प्रकारे, तुमच्यापैकी जो आपल्या सगळ्या संपत्तीकडे पाठ फिरवत नाही* तो माझा शिष्य होऊ शकत नाही.+
३४ मीठ नक्कीच चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर त्याची चव कशाने आणता येईल?+ ३५ ते जमिनीसाठी किंवा खतासाठी उपयोगी राहणार नाही आणि लोक ते फेकून देतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”+