येशूचे जीवन व उपाध्यपण
गर्विष्ठ आणि नम्र
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे सद्गुण वर्णिल्यावर येशू आपले लक्ष त्याच्या सभोवार असणाऱ्या गर्विष्ठ व चंचल लोकांकडे वळवितो. “ही पिढी,” तो म्हणतो, “जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारुन म्हणतातः ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला, तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही उर बडवून घेतले नाहीत, त्याच्यासारखी . . . आहे.”
येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? तो स्पष्ट करतोः “योहान खातपीत आला नाही तरी ‘त्याला भूत लागले आहे’ असे ते म्हणतात. मनुष्याचा पुत्र खातपीत आला, तर त्याच्याविषयी ते म्हणतातः ‘पाहा, खादाड व दारुबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र!’”
लोकांचे समाधान करणे अशक्य आहे. काहीही त्यांना संतुष्ट करीत नाही. योहानाने नाजीर या अर्थाने स्व-त्यागाचे कठोर जीवन व्यतित केले होते. दिव्यदूताने त्याच्याविषयी आधी ही घोषणा केलीच होती की, “तो द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही.” तरीही लोक, त्याला भूत लागले आहे असे म्हणू लागले. उलटपक्षी, येशू साधारण माणसासारखे जीवन व्यतित करीत होता, त्याने कठोर जीवन आचरले नाही तरीही त्याला अतिसेवन करणारा असे लोक म्हणायला लागले.
तेव्हा, लोकांना संतुष्ट करणे किती जड आहे बरे! ते आपल्या सवंगड्यासारखे आहेत जे, काही मुले पावा वाजवू लागली तरी नाचायला येत नाही आणि दुःख केले तरी त्यांच्यासोबत दुःखी होत नाहीत अशांसारखे आहेत. तरीपण येशू पुढे म्हणतोः “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.” होय, कृत्ये किंवा पुरावा हा योहान तसेच येशूविषयी जे दोषारोप करण्यात आले आहेत ते खोटे असल्याचे स्पष्ट करतो.
आता येशू, त्याने जेथे आपले अद्भूत चमत्कार केले त्या खोराजिन, बेथेसैदा आणि कफर्णहूम या शहरांवर दोषारोप ठेवतो. ही अद्भूत कृत्ये त्याने सोर व सीदोन या फेनीकेच्या शहरात केली असती तर येशू म्हणतो की, यांनी गोणताट व राख अंगावर घेऊन पश्चताप केला असता. कफर्णहूम, जे त्याच्या उपाध्यपणामधील केंद्र होते त्याचा धिक्कार करताना येशू सांगतोः “न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल.”
आता येशूच्या या म्हणण्याचा काय अर्थ आहे? सदोम्यांचे पुनरुत्थान होऊ शकणार नाही हे सांगण्यासोबत तो येथे कफर्णहूमच्या लोकांचा दोषीपणा खूप असल्याचे सूचित करीत होता हे स्पष्ट आहे. यासाठी त्याने हे दाखविले की, न्यायाच्या दिवशी सदोमी लोकांचे मुळीच पुनरुत्थान होऊ शकणार नाही असे जे त्याच्या इस्राएली श्रोत्यांच्या मनात होते तरी कफर्णहूमातील लोकांचा दोषीपणा पाहू जाता त्या प्राचीन सदोम्यांना अधिक सोपे जाणार होते.
यानंतर येशू जाहीरपणे आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव करतो. याचे कारण हे की देव आपली मोलवान आध्यात्मिक सत्ये ज्ञानी व विचारवंत लोकांना देत नाही तर या अद्भूत गोष्टी तो नम्रजनांना, जे जणू बाळकांसारखे आहेत अशांना प्रदान करतो.
शेवटी येशू हे अपीलकारक निमंत्रण देतोः “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवांस तजेला मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”
येशू हा तजेला कसा देतो? हे तो सांप्रदायिक बंधनापासून लोकांना मुक्ती देऊन करतो. शब्बाथाच्या नियमाचे कडक पालन करावे अशासारख्या संप्रदायाद्वारे धर्मगुरुंनी लोकांना पिळून टाकले होते. याखेरीज, जे राजकीय अधिकाऱ्यांच्या जाचाखाली दबले आहेत तसेच जे पापामुळे सतावणाऱ्या विवेकाच्या भाराखाली आहेत अशांना तो मुक्तीचा मार्ग दाखवितो. अशा पिडीतांना त्यांच्या पातकांची कशी क्षमा मिळेल आणि त्यांना देवासोबत मोलवान नातेसंबंध कसे जोपासता येतील हे तो प्रगट करतो.
जे सोयीचे जू येशू सादर करतो ते देवाला पूर्णपणे केलेले समर्पण आणि आमच्या दयाळू व कनवाळू स्वर्गीय पित्याची सेवा करणे हे आहे. शिवाय जे हलके ओझे येशू त्याच्यापाशी येणाऱ्यांना देत आहे ते जीवनासाठी देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे आहे. देवाच्या आज्ञा भारी नाहीत. मत्तय ११:१६-३०; लूक १:१५; ७:३१-३५; १ योहान ५:३.
◆ येशूच्या काळची पिढी मुलांसारखी कशी होती?
◆ कफर्णहूमापेक्षा सदोमाला अधिक सोपे कसे जाणार होते?
◆ लोक कोणत्या भाराखाली दबलेले आहेत आणि येशू यांना कोणती मुक्तता सादर करतो?